मुंबई : वरळीमध्ये सामाजिक न्याय विभागाची तीन शासकीय वसतीगृहे आहेत. यापैकी दोन वसतीगृह मुलांसाठी असून एक वसतीगृह मुलींसाठी आहे. वरळी बीडीडी चाळ ११६ मध्ये १,२,३ माळ्यावर संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतीगृह आहे. वसतीगृहात १०० हुन अधिक विद्यार्थीनी सध्या वास्तव्यास आहेत. गुरुवारी दुपारी वरळीच्या संत मीराबाई शासकीय वसतीगृहात २० वर्षीय शितल शिर्के नावाच्या विद्यार्थीनीने गळ फास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी वरळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शितल ही मुळची शहापूरची रहाणारी असून मुंबईत सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून डिप्लोमा करत होती. अशी प्राथमिक माहिती समोर आली असून वरळी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर वसतीगृहातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.