HW News Marathi
मनोरंजन

Vijay Diwas : भारत- पाक युद्धाविषयी थोडक्यात

पूर्व पाकिस्तानातील भयंकर हिंसाचारामुळे भारतात येणार्‍या आश्रितांची संख्या प्रचंड वाढली. ती १ कोटीच्याही वर गेली. भारतावर यामुळे आर्थिक ताण पडू लागला. त्यातच पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले.

एप्रिल १९७१ मध्ये श्रीमती गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला. ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला खासकरून अमेरिकेला वब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला. या मैत्रीने चीनची युद्धात उतरून मध्यस्थी होऊ शकण्याची शक्यता कमी झाली. चीन हा पाकिस्तानचा मित्रदेश असला तरी त्याने युद्धकाळात तटस्थ राहणे पसंत केले.

दरम्यानच्या काळात मुक्तिवाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली.

नोव्हेंबर पर्यंत घडामोडींना आणखीनच वेग आला व युद्धाची शक्यता अटळ झाली. भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले. पावसानंतरच्या काळात जमीन बर्‍यापैकी कोरडी झाली होती.तसेच हिमालयात थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली. नोव्हेंबर २३ १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार रहाण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवार डिसेंबर ३ रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याचे पाकिस्तानी तंत्र होते. पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा फारसा फायदा झाला नाही उलट भारताला आक्रमण करायला सबळ कारण मिळाले व दुसर्‍या दिवशीच इंदिरा गांधींनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करायचे आदेश दिले व भारताने अौपचारिकरित्या युध्दाची घोषणा केली .

भारतीय आक्रमणाची दोन उदिष्टे होती. १) पूर्व पाकिस्तानात जास्तीत जास्त आत घुसून पूर्व पाकिस्तानचा ताबा मिळवणे. २) पश्चिम सीमेवर पश्चिम पाकिस्तानातून येणार्‍या पाकिस्तानी फौजेला फक्त रोखून धरायचे. पश्चिम पाकिस्तानात घुसून कोणत्याही परिस्थितीत आक्रमण करायचे नाही असा भारताचा बेत होता.

या उलट पाकिस्तानी सेनेची उदिष्टे होती. १) भारताला पूर्व पाकिस्तानात घुसण्यापासून रोखणे. पूर्व पाकिस्तानात आत खोलवर घुसणे बरेच अवघड होते व भारतीय सेनेला त्यात जास्तीत जास्त वेळ लागेल असे पहाणे २) दरम्यान पश्चिमेकडून भारतात घुसून जास्ती जास्त भूक्षेत्राचा ताबा मिळवणे. भारताने पश्चिम सीमेवर त्यामानाने कमी सैन्य तैनात केले होते. त्यामुळे त्यात पाकिस्तानी सेनेला यश मिळेल असा विश्वास होता. या दोन्हीत यशस्वी झाल्यावर भारताची कोंडी होईल अशी पाकिस्तानी लष्कराची चाल होती.

पाकिस्तानने पहिले आक्रमण करून युद्धाची सुरुवात केली खरी परंतु त्यांना त्याचा संवेग राखता आला नाही. पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्‍न केला, परंतु भारतीय सेनेपुढे त्याचे काही एक चालले नाही. त्यातील एका पुढे प्रसिद्ध झालेल्या लोंगेवालाच्या लढाईत त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाई हल्यात पाकिस्तानी चिलखती (रणगाडा) तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश आले. याउलट भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किमी इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.

भारतीय वायुसेनेने या युद्धात जबरदस्त कामगिरी नोंदवली. ऑपरेशन पायथॉन या नावाखाली भारतीय नौदल व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे विमानवाहक युद्धनौकांचा वापर करून पूर्व पाकिस्तानात चितगाव येथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केला.. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे केली. त्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पश्चिमेकडे भारतीय नौदलाने कराची बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या.

भारतीय पायदळाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठ्या प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने डाक्का शहर काबीज केले. ९०,०००हून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले.१६ डिसेंबर रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली. दुसर्‍या दिवशी पाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्करली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी द्यावी | कंगना रणावत

swarit

Kargil Vijay Diwas : सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करून देतो !

News Desk

‘वडिल-मुली’च्या नात्याला समर्पित करणारे गाणे !

News Desk