HW News Marathi
मनोरंजन

Vijay Diwas :भारत – पाक युद्धाची पार्श्वभूमी

१९७० च्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील अवामी लीग ने १६९ मधील १६७ जागा जिंकल्या व इस्लामाबादमध्ये संसदेत अवामी लीगचे बहुमत झाले. आवामी लीगचे नेते शेख मुजिबूर रहमान यांनी राष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा सादर केला. पाकिस्तानच्या स्थापनेपासून राजकारणात वर्चस्व ठेवणार्‍या पश्चिम पाकिस्तानातील खास करून पंजाबी व पठाणी राजकारण्यांना बंगाली वर्चस्व होणे मान्यच नव्हते. झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुजिबूर यांना पंतप्रधानपद देण्यास विरोध केला. राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पूर्व पाकिस्तानात सेनेला तैनात केले.

पूर्व पाकिस्तानात यानंतर सर्वत्र अटकसत्र व दडपशाही सुरू झाली. पूर्व पाकिस्तानी सैनिक व पोलिसांना निःशस्त्र करण्यात आले. पूर्व पाकिस्तानमध्ये यामुळे बंद, हरताळ, मोर्चे यासारखे प्रकार वारंवार होऊ लागले. पाकिस्तानी सेनेने हे सर्व प्रकार दडपून मार्च २५ १९७१ रोजी डाक्क्याचा ताबा मिळवला व अवामी लीगवर बंदी घालण्यात आली. मुजिबूर रहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तान त्यांची रवानगी झाली. पूर्व पाकिस्तानातील हिंदूचे मोठ्या प्रमाणात शिरकाण सुरू झाले.

मार्च २७ १९७१ रोजी झिया उर-रहमान यांनी मुजिबूर रहमान यांच्या वतीने बांगला देशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व एप्रिलमध्ये छुप्या सरकारची स्थापना केली. यामुळे पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्याची ओढ लागलेले हजारो लोग मुक्तिवाहिनीमध्ये (एक स्वतंत्र सैन्यदल) सामिल झाले.

भारत पाक युद्धादरम्यान भारतातील घडामोडी

मार्च २७ १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. पूर्व पाकिस्तानात चाललेल्या मानवी हत्यांमुळे भारतात मोठ्या संख्येने तिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले. सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या. अज्ञातवासातील बांगला सैनिकांनी व लष्करी अधिकार्‍यांनी लगेचच मुक्तिवाहिनीच्या स्वयंसेवकांना तयार करण्यास सुरुवात केली.

पूर्व पाकिस्तानातील भयंकर हिंसाचारामुळे भारतात येणार्‍या आश्रितांची संख्या प्रचंड वाढली. ती १ कोटीच्याही वर गेली. भारतावर यामुळे आर्थिक ताण पडू लागला. त्यातच पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले.

एप्रिल १९७१ मध्ये श्रीमती गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला. ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला खासकरून अमेरिकेला वब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला. या मैत्रीने चीनची युद्धात उतरून मध्यस्थी होऊ शकण्याची शक्यता कमी झाली. चीन हा पाकिस्तानचा मित्रदेश असला तरी त्याने युद्धकाळात तटस्थ राहणे पसंत केले.

दरम्यानच्या काळात मुक्तिवाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोप्या रांगोळ्या…

swarit

पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात

News Desk

#KaderKhan : ‘विजय दीनानाथ चौहान…’ च्या यशातील मोठा भागीदार

News Desk