HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार!

मुंबई । राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र, आगामी निवडणुका लढवण्याच्या संदर्भात या तीनही पक्षांची वेगवेगळी भूमिका दिसून येत आहे. अशातच काँग्रेसकडून मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवारी देणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी सातत्याने स्वबळाची भूमिका घेतली असून आता पुन्हा एकदा भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीत काँग्रेस सर्वच्या सर्व २३६ जागांवर उमेदवार उभे करेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ‘हम पुरा लडेंगे और पुरा जितेंगे’, असा नाराही दिला.

देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसची गरज

मुंबई काँग्रेसच्यावतीने मंगळवारी आझाद मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाई जगताप बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची ही परंपरा यापुढील काळातही कायम राहील आणि राहिली पाहिजे. आज देश ज्या भीषण परिस्थितीतून जात आहे, यातून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसची गरज आहे, असे जगताप म्हणाले. तसेच महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेस सर्व २३६ जागांवर एकट्याने लढणार आहे आणि पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. शिवाय ‘आम्ही सर्व जागा लढवून जिंकू’, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये भाई जगताप यांच्यासह मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी तसेच मुंबई काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक,अजित पवारांच्या सूचनेनुसार घाट, विखेंचा आरोप!

News Desk

बँकांची कामे उरका; चार दिवस बँका बंद

News Desk

जाणून घ्या…शिंदे सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

Aprna