मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्वीट हँडलवरून तीव्र शब्दात निशेष व्यक्त केली आहे. "कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा!," अशी कॅप्शन देऊन पत्र ट्वीट करत राज ठाकरेंनी केतकीवर टीका केली आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्धा तिने किंवा त्या भावेने लिहिणे साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो..तशी टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत...! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु, अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक आहे, की महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.
केतकीने काल (१३ मे) तिच्या फेसबुक पोस्टवर शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पवित्र घेतला. या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्याच्या कळ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच पुण्यात आज (१४ मे) राष्ट्रवादीच्या संस्कृतिक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आली आहे. कळव्यात केतकीविरोधात पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२), ५०१, आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरेंनी पत्रात नेमके काय म्हणाले
कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखे लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असे नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्धा तिने किंवा त्या भावेने लिहिणे साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो..तशी टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत...! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु, अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक आहे, की महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे, असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला म्हणणे हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरुन काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाज-समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकार्त्यांनाही समजले असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारने ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.