HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग लाल, ‘कालरात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

श्री कालरात्री देवीमाता श्री आदिमाया आदिशक्ती दुर्गा परमेश्वरीच्या नवदुर्गा अवतारातील सातवे रूप आहे. या देवीचा वर्ण गडद काळा असून ती तीन नेत्रांची आहे. ही देवी चतुर्भुजा असून तिचे केस अस्ताव्यस्त आहेत. असे अक्राळ-विक्राळ आणि विराट रूप तिने धारण केले आहे. याविश्वातील सर्व नकारात्मक ऊर्जा या सर्व वाम शक्ती, राक्षसी वृत्ती हिच्या आगमनाने दूर पळतात.

कळी-काळालाही हिचा धाक असतो. त्यामुळे तिला कालरात्री म्हटले जाते. ही माता विश्वसुंदरी असूनही तिने असे हे आक्राळ-विक्राळ विद्रुप रूप देवगणांच्या व भक्तगणांच्या कल्याणासाठीच धारण केले आहे. तिचा काळा रंग गुणदोष व अपराध सामावून घेणारा आहे. कालरात्री मातेचे वाहन गर्दभ असून तीन नेत्र हे त्रिभुवनांचे प्रतीक आहेत. हिच्या चारही भुजा चारही दिशेने संकटापासून रक्षण करण्यासाठी विविध आयुधे धारण करणाऱ्या आहेत. तिने डाव्या हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात शुभ्र पांढऱ्या रंगाचे वज्र धारण केले आहे.

सर्व वाम शक्तीचे निर्दालन व निष्पात करण्यासाठी या देवीने ही शस्त्रे धारण केली आहेत. हिच्या पूजनाने जीवनातील सर्व आधीव्याधी नष्ट होतात. मृत्यूचे भय दूर होऊन अपमृत्यु होत नाही. निर्बल मन निर्मळ आणि दुर्बल शरीर सबळ होते. तेजापुंज देह होऊन कोणतेही भय न राहता साधक निर्भय होऊन राहतो. अशा साधकाला पाहून शत्रूदेखील मित्र होतात. या देवीचे वर्णन भयंकर असले तरीही हिच्या आराधनेने जीवनात आनंद प्राप्त होते.

सर्व भक्तगणांवर कृपादृष्टी असावी म्हणून तिने सप्तशृंगी गडावर आगमन करून तेथेच वास्तव्य केले. सात डोंगरांच्या वर राहणारी ही सप्तशृंगी म्हणून ओळखली जाते. तिच्या आगमनाने पर्वतमय डोंगराळ भागाचे नंदनवन झाले. जाई, जुई, शेवंती, मोगरा, गुलाब, कमळ अशा सर्व प्रकारच्या सुगंधित सुमनपुष्पांनी सप्तशृंगी गडाचे नंदनवनात रूपांतर होऊन दीर्घायुष्य प्राप्तीसाठी सर्व प्रकारच्या वनौषधी वृक्ष तिच्या पदस्पर्शाने तयार झाली. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे शक्तीपीठ महत्त्वाचे मानले जाते. विशेष म्हणजे या पिठातील देवीची मूर्ती अठरा हात धारण केलेली आहे. अठरा हात हे अठरा पुराणांचे प्रतीक आहे.

जगाची अंबा तीच जगदंबा म्हणून प्रसिद्ध पावलेली आहे. या देवीने सर्व राक्षसांचे निर्दालन केले म्हणून कृज्ञतापूर्वक देवीच्या घटाला झेंडूच्या फुलांची माळ घालून कडकण्याचे तोरण बांधले जाते. कडकणे म्हणजे चण्याचे पीठ, गव्हाचे पीठ, मैदा, गूळ यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या नक्षीदार सूर्याच्या आकाराच्या पुऱ्या. तसेच देवीच्या साज-शृंगाराच्या साहित्याची प्रतिमा करून देवी घटावर बांधतात. देवीच्या पराक्रमाची वीरश्रीच प्रतीक म्हणून अहिरावण आणि महिरावण यांना या देवीकडून मोक्ष प्राप्त झाला आहे. म्हणून त्यांच्या प्रतिमाही घटाला बांधल्या जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग गुलाबी, ‘सिद्धीदात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।

News Desk

आव्हानांचा सामना करत ‘ती’ने केले स्वप्न साकार

News Desk